सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत, मंत्री पदावर आहात, हे लक्षात ठेवा; सत्तारांच्या विधानांचा अजित पवारांकडून समाचार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील मंत्र्यांची कानउघडणी केली आहे . कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल होत. त्यानंतर रामदास कदम यांनीही वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच, मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या फायर ब्रिगेड सुषमा अंधारे यांचा नटी, बाई असा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले, मी दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळी भेट घेऊन त्यांना इशारा दिला होता. तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलंय. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय, लक्ष ठेवा, असं समजावलं होतं. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तणावाखाली काम करतायत. मंत्रीपदावरील व्यक्ती काहीही बोलून नंतर मी सहज बोललो असं म्हणतायत… पण सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत. मंत्री पदावर आहात, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार सत्ताधारी मंत्र्यांची कानउघडणी केली.

तसेच, लोक ऐकत, पहात असतात. लक्षात ठेवत असतात, असं सांगितलं होतं… मंत्री काहीही वक्तव्य करतात.. चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का… असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे.नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांची कानउघडणी केली. मंत्रि पदावर असताना घटना, नियम यांचा आदर करायचा असतो. अंबरनाथमध्ये दिवसा-ढवळ्या बैलगाडा शर्यतीवरून गोळीबार घडला. सरकार काय करतंय? ठाणे जिल्ह्यात किसन नगरमध्ये दोन गटात राडा झाला, पोलीस यंत्रणा राजकीय वाद सोडवण्यात बिझी झाली तर उर्वरीत कामं कोण करणार असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *