शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता चाचणी फेब्रुवारीत होणार, निकाल मार्चमध्ये
१५ नोव्हेंबर २०२२
पुणे
शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी फेब्रुवारी महिन्यातच घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेसाठी टीसीएस,आयबीपीएस आणि एमकेसीएल संस्थांमधून एका संस्थेची निवड करण्यात आली आहे. परीक्षेसाठी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यासाठी तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिक्षा परिषद संबंधित परीक्षेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार आहे. तर, टीसीएस,आयबीपीएस आणि एमकेसीएल संस्थेपैकी एका संस्थेची निवड झाली असून, संबंधित संस्थेचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची आढावा बैठक मंगळवारी (दि.15) घेण्यात येणार आहे. सध्या तरी न्यायालयात सादर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याची तयारी राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार, 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. परिक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे.