पेग्विन सेनेच्या “आदित्य” कारभारामुळे गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे लागले – आशिष शेलार
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२
मोदी सरकारने अभियांत्रिकी अभ्यासक्रम मातृभाषेत करण्याची घोषणा केली, त्यानंतर आता मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकांचं विमोचनही होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
शेलार म्हणाले, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या नावाने गळे काढायचे, ते गळेखोर आता कुठे लपले आहेत? कारण, मोदी सरकारने केवळ घोषित नाही केलं, तर प्रत्यक्षात आता करून दाखवलं आहे. की अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा आपल्या मातृभाषेत करण्याची घोषणा केली आणि आता तर आज मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकांचं विमोचन होत आहे. महराष्ट्रातील गावाखेड्यातील जवळपास डिप्लोमामधील ३७ टक्के विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचं ठरवलं आहे.
पेग्विन सेनेच्या “आदित्य” कारभारामुळे गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे लागले, तर विद्यार्थी संख्या १ लाखावरून ३५ हजारांवर आली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात उच्च व तंत्रशिक्षण आता मराठीतून मिळणार आहे. वा रे वा! मराठी शाळा बंद करुन पब्लिक स्कूल? मराठीचे तथाकथित रक्षणर्त्यांचे मराठी प्रेम म्हणजे थंडा थंडा कूल कूल! किंवा यांचे मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल! अशी टीका आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे केली आहे.