साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत – जयंत पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरून शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे.

सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातोय. साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचं तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे असं जयंत पाटील म्हणाले.

मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे. मात्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ. महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *