गुरुवारपासून आळंदीत वाहनांना प्रवेशबंदी
१४ नोव्हेंबर २०२२
आळंदी
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला गुरुवार (दि. १७) पासून प्रारंभ होणार असून, या काळात शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पोलिस प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे वारीकाळात वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली असून, केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. गुरुवार (दि. १७) ते बुधवार (दि. २३) पर्यंत ही बंदी असणार असून, या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.
वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर-महामार्गमार्गे चाकण, वडगाव घेणंद, कोयाळी, मरकळ असा व नगर महामार्गमार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी व चन्होली बुद्रुक फाटा ते चन्होली खुर्द अशा जोडरस्त्याचा वापर करता येणार आहे. दरम्यान, सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होत असून, आळंदी पोलिसांच्या वतीने सोहळ्यासाठी प्रत्येक मुख्य चौकात दक्षता कक्ष उभारला आहे. प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवीत असून, ते परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून असणार आहेत.