मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या अपेक्षा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


अफझलखान कबरीवरील अतिक्रमण हटविल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर इतर किल्ल्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी असे सांगत, या मोहिमेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचीही ग्वाही या पत्रकातून दिलेले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांचे पत्रक –

अभिनंदन… पण इतक्यावर थांबू नये !

स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वैर संपते, या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली, असे इतिहासकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊन सुध्दा हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते. परंतु काल शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झालेली आहे. केवळ प्रतापगडच नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे. विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. मात्र लोहगड, मलंगगड, चंदन वंदन सारख्या अनेक किल्ल्यांवर देखील अलीकडच्या काळात ही व्याधी जडत चाललेली आहे. यंत्रणांच्या हेतुपुरस्पर डोळेझाकीमुळे या गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात घातला जातो आहे.

काही महिन्यांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्याने आम्ही हाणून पाडला होता. आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली तरी परवानग्या आणायला दिल्लीत पन्नास बैठका बैठका घ्याव्या लागतात आणि इतके करूनही परवानगी मिळत तर नाहीच. मात्र इतरांना हे नियम लागू होत नाहीत का ? ही मुजोरी मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन !

या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देतो…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *