T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव; इंग्लंडचा १० गडी राखून विजय
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२
टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडनं भारताला १० गडी राखून मात दिली आहे. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनीच भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना, विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न व या स्पर्धेतील भारताचे आव्हान आज संपुष्टात आले आहे.
भारताला टी २० विश्वचषकाच्या सामन्यातून अशाच प्रकारे न्यूझीलँडने बाहेर काढले होते तर मागील वर्षी पाकिस्तानने सुद्धा अशाच प्रकारे १० गडी राखून भारताचा पराभव केला होता. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ हा सर्वात यशस्वी संघ ठरला होता, दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्याचा वगळता भारताने आतापर्यंतचा प्रत्येक सामना जिंकला होता.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत संघाला १६८ ची धावसंख्या उभारण्यास मदत केली होती, विराट कोहलीने सुद्धा या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले.१६९ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. बटलरने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा तर हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या १७ षटकातंच इंग्लंडनं भारताला १० गडी राखून मात दिली आहे.