गृहमंत्रीपद झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा – सुषमा अंधारे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२
देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत. त्यांना हे झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी संभाजी भिंडे यांनी महिला पत्रकाराला टिकली वरून वादग्रस्त विधान केलं होत. तर सोमवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना शिवीगाळ केली होती. त्यांच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्द देखील काढत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना राजीनामाच मागितला. त्या म्हणाल्या देवेंद्रजी या सगळ्यांवर कारवाई करता येत नसेल, तुम्हाला काम झेपत नसेल तर सरळ राजीनामा द्या. आम्हाला महिला आयोगाला लक्षात आणून द्यायचं आहे. प्रेमपत्रासारख्या नोटीसा पाठवून काहीही होणार नाही. त्याच्या तक्रारी दाखल झाल्या पाहिजे. संबंधित माणसावर कारवाई होणं किंवा आयोगाने त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं असतं, अशी टिप्पणीही त्यांनी महिला आयोगावर केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते महिलांचा सन्मान करत नाहीत. संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल देवेंद्र फडणवीस का व्यक्त झाले नाहीत. अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस टिकलीवरुन बोलतील का? असा प्रश्न विचारला आहे. गुलाबराव पाटील हे सरंजामी वृत्तीचे आहेत. त्यांचे वाक्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाला आक्षेपार्ह वाटत नाही. पोलीस देखील गुलाबराव पाटलांचे हस्तक आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. नारायण राणे यांची मुलं जाणीवपूर्वक मातोश्री ठाकरे गटांच्या महिलांबद्दल वादग्रस्त बोलतात. त्यावर देवेंद्रजी तुम्ही काय बोलणार आहे का असंही त्या म्हणाल्या.