आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे – आदित्य ठाकरे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबई येथील घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनाक्रमानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे बुलढाण्यातील सभेत म्हणाले, आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे.या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मीउच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का? महाराष्ट्रातील जनता म्हणून मी तुम्हालाही विचारत आहे की, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का? असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का? असे सवालही आदित्य ठाकरेंनी विचारले आहेत.