आर्थिक आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे मागच्या दारानं मनुस्मृती आणण्याचा हा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२
सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक मागासांसाठीचं 10 टक्के आरक्षण (EWS) कायम ठेवण्याचा मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच पैकी तीन न्यायाधीशांनी या आरक्षणाच्या बाजूने तर दोन न्यायाधीशांनी आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, या आरक्षणाव प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. आर्थिक आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब म्हणजे मागच्या दारानं मनुस्मृती आणण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाय हा वैचारिक भ्रष्टाचारही आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा, ओबीसी आणि पाटीदार समाजाचे आंदोलनं सुरू होईल. शिवाय आजच्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाची स्वायत्तता धोक्यात आली असून कोर्टाच्या निर्णयावर अतिक्रमण होतंय, असं त्यांनी सांगितलं. यापुढे सुप्रीम कोर्टाचे निर्णय संसदेत फ्रेम केले जातील असा प्रश्न उपस्थित होतोय, असंही ते म्हणाले.