रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत – गुलाबराव पाटील
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२
काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वाद सुरू आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असा आरोप आमदार राणा यांनी केला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा यांना एक तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावे, असा अल्टीमेटम दिला होता.या सगळ्या प्रकरणावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तुमचा अमरावती जिल्ह्यातील वाद आहे. तुमच्या स्थानिक वादामुळे राज्यातील 40 आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. कोणीही बिकाऊ नाही, याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. रवी राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा, अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.