वाडवडिलांनी जे कमावलं ते मुलांनी एका मिनिटात घालवलं – एकनाथ खडसे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेललं ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटासोबतच ठाकरे गटाला सुनावलं आहे.

राज्यातलं वातावरण राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. असं राजकारण गेल्या ३०-४० वर्षांत राज्यात कधीही पाहिलं नाही. एकमेकांच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर आरोप करणं हे कधीही झालं नाही. विरोधासाठी विरोध व्हायचा. पण नंतर सगळे एकत्र यायचे. आता शत्रुत्व असल्यासारखं सगळं चालू आहे. चिन्ह गोठवणं, आपल्याच पक्षात अशी बंडखोरी करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य नाही. आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत केली. धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या धनुष्यबाणाच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता काबीज केली. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. पण ही वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं, ते एका मिनिटात मुलांनी घालवलं. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल, असं एकनाथ खडसे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *