अमित शाह यांच्याबद्दल बोलण्याची राजकीय परिस्थिती, ताकद उद्धव ठाकरेंना अजून कमवावी लागेल – आशिष शेलार
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२३ सप्टेंबर २०२२
पत्रकार परिषदेत बोलत असतांना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
काय म्हणाले होते आशिष शेलार –
उद्धव ठाकरेंचे मेळाव्यातील भाषण म्हणजे पायाखालची जमीन आणि हातातली वाळू हे दोन्ही सरकायला लागल्यावर उरल्यासुरल्या ‘पेग्विन’ सेनेला एकत्र ठेवण्यासाठी केलेला एकपात्री प्रयोग आहे. पंतप्रधान मोदी हे 100% मुंबईकरांसोबत आहेत, मुंबईकरांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान आल्यावर मला लपायलाही जागा कडीआड मिळणार नाही या भीतीने पंतप्रधान येणारच आहेत याची आवई उद्धव ठाकरे उठवत आहेत, यात त्यांची भीती दिसते. तसेच अमित शाह यांच्याबद्दल बोलण्याची राजकीय परिस्थिती, ताकद आणि त्या स्तरावरची भूमिका उद्धव ठाकरेंना अजून कमवावी लागेल. किमान महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणा, किमान एकदा १०० आमदार निवडून आणा आणि मग अमितजी शाह यांच्या वाटेला जा असेही शेलार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलात पण देवेंद्रजी हे जमिनीवरचे नेते आहेत, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची, संघाची ताकद आहे, असे प्रयत्न तुम्ही वारंवार केलेत तरी वारंवार तुम्हाला पटकीच मिळेल असा इशारा शेलारांनी उद्धव ठाकरेंना दिला. तसेच आदित्य ठाकरे हे भाजपाच्या मतांवर निवडून आले आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन स्वतःच्या मतांवर निवडून येऊन दाखवावे. आमच्या मतांवर निवडून यायचे आणि फुशारक्या मारायच्या हे धंदे मान्य नाहीत असेही शेलार म्हणाले.