नामशेष होत असलेली पत्रलेखन कला मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी जोपासली
रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२० सप्टेंबर २०२२
बेल्हे
मोबाईलमुळे सध्या नामशेष होत असलेली पत्रलेखन कला बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहून ते पोस्टाने पाठवले व त्यातून त्यांचे दोघांचे ऋण व्यक्त केले. आपल्या मुलाने आपल्या नावे लिहलेले पत्र जर तुम्हाला पोस्टमने दिले तर! नक्कीच तुम्हाला ही खूप आनंद होईल.अशाच आनंद बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या शाळेने पालकांना मिळाला आहे.
नामशेष होत असलेली पत्रलेखन कला विद्यार्थ्यांमध्ये विकसित
पत्रलेखन ही अशी एक कला आहे जात आपण आपल्या मनातील भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. पण हल्ली टीव्ही, स्मार्टफोनच्या युगात नातेवाईकांना, मित्रांना पोस्टाने पत्र पाठवणे हे आता कालबाह्य झाले आहे. पूर्वी प्रमाणे गावोगावी कौटुंबिक पत्र वाटप करणारे पोस्टमन सद्या फिरताना दिसत नाहीत.तुमचं पत्र आलं आहे, पोस्टमन चे हे शब्द सुद्धा आता कानावर पडत नाहीत. मोबाईल,व्हाट्सएप,फेसबुक,इंस्टाग्रामच्या जमान्यात पत्रलेखन ही कला नामशेष होत चालली आहे.
शुभेच्छा पत्राचे प्रमाण ९० टक्क्यांनी घसरले
मुलांना पत्रलेखनाची माहिती करून देणे, आपले भावभावना पत्रातून व्यक्त करता येणे, पत्रलेखन कला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे,आवड निर्माण करणे असे विविध उद्देश समोर ठेवून हा पत्रलेखन उपक्रम शाळेत राबवण्यात आला. पत्रातून व्यक्त केलेल्या भावना लेखी स्वरूपात चिरकाल टिकवून ठेवल्या जातात. अचानक आपल्या चिमुकल्या मुलाने स्वतः आई-वडिलांना लिहलेल्या पत्रातील ऋण वाचून अक्षरशः पालकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत आहेत.हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव मिळाल्याने शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी शाळेचे मराठी विषय शिक्षक रामदास सांगळे, प्रमोद सुपेकर, अर्चना भुजबळ यां शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तर शाळेच्या प्राचार्य विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे,सर्व संचालक मंडळ,पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
मोबाईलच्या जमान्यात पत्रलेखन होतंय नामशेष
सोशल मीडियाच्या काळात शुभेच्छा पत्र व कौटुंबिक पत्र ९० टक्क्याने कमी झाले आहेत.पूर्वी दिवाळी,दसरा,नवीन वर्ष,वाढदिवस यासाठी शुभेच्छा पत्र मोठा प्रमाणात पाठवले जात असत.सध्या कौटुंबिक पत्राचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेने पत्रलेखन कला विकसित करण्यासाठी चांगला उपक्रम राबवला.असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे – मिनल फटांगरे सब पोस्ट मास्टर, बेल्हे पोस्ट ऑफिस