विधानभवनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न उपचार सुरु असताना पवारांनी घेतली भेट

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२४ ऑगस्ट २०२२


विधानभवन परिसरातून मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका शेतकऱ्याने (farmer) विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सुभाष देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे सातारा जिल्ह्यातील कांदळगावचे रहिवासी आहेत. त्यांनी अंगावर रॉकेल टाकत स्वत:ला पेटवून घेतलं मात्र पोलीस वेळीच घटनास्थळी हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आग नियंत्रणात आणत त्यांना उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केले. शेतीच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारयांनी जे. जे रुग्णालयात जाऊन सुभाष देशमुख यांची भेट घेतली आहे.

अजित पवार यांनी देशमुख यांच्या तब्यतीची चौकशी केली. शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने काही काळ विधानभवन परिसरात गोंधळ उडाला होता.सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. चार दिवस वादळी ठरले आहेत. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे, फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केले. तसेच यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबादी देखील करण्यात आली.सध्या अधिवेशनात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांचा मुद्दा गाजत आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता मंगळवारी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पाचव्या दिवशी आज अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाचे पहिले चार दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले. मात्र आज पाचव्या दिवशी चित्र काहीस वेगळ दिसून येत आहे. शिंदे गट आणि भाजप आमदार आक्रमक झाले असून, त्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाझेंचे खोके मातोश्री ओक्के अशा घोषणा शिंदे गट आणि भाजपाकडून देण्यात आल्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *