लवकरच तिसऱ्या ठाकरेंची एन्ट्री, पोस्टर्सवर तेजस ठाकरे झळकले

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१९ ऑगस्ट २०२२


उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे यांच्या राजकीय लाँचिंगकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील दहीहंडीउत्सवानिमित्त तेजस ठाकरेयांचं राजकीय लाँचिंग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळेच मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमाकरिता शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तेजस ठाकरे यांचेही फोटो झळकत आहेत. युवा नेतृत्व आदित्य ठाकरे तर युवा शक्ती म्हणून तेजस ठाकरे यांचे पोस्टर्स गिरगावात लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाळी मोडून काढत, शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.शिवसेनेचे ढासळलेला बुरूज पुन्हा उभारण्यासाठी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते मुंबईसह राज्यभरात शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींतून पक्षसंघटन वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत.

उद्धव ठाकरेदेखील काही दिवसातच महाराष्ट्रभर दौरे काढणार आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात कधी उतरतात याकडे मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी करा अथवा मरा अशी स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी ठाकरेंनी केलेली दिसून येतेय….तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीचा विषय येतो तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाक्याचा नेहमीच उल्लेख केला जातो. ”उद्धवचा नंबर दोनचा मुलगा माझ्यासारखाच सेम आहे. त्याच्या आवडीनिवडी माझ्याशी जुळतात… असं बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या भाषणात जाहिर केलं होतं.

तेजस ठाकरे हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैव विविधतेवर संशोधन करत आहेत. आता आदित्य ठाकरेंच्या बरोबरीने ते राजकारणात उतरतील अशी शक्यता आहे.वरळी या आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातून यंदा भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. वरळीतील जांभोरी मैदान येथे भाजपतर्फे दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी भाजपच्या मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच आदित्य ठाकरेंविरोधात टाकलेली ही पहिली आणि दमदार खेळी म्हटली जात आहे. मात्र भाजपने कितीही मोठे थर रचले तरी वरळी आणि एकूण मुंबईतील शिवसेनेला कुणीही पराभूत करू शकत नाहीत, असे आदित्य ठाकरे आणि शिवसेना समर्थकांकडून ठणकावून सांगण्यात येतंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *