शिरूर चे भाजपचे माजी आमदार कै. बाबुराव काशिनाथ पाचर्णे काळाच्या पडद्याआड

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
११ ऑगस्ट २०२२

शिरूर


शिरूर तालुक्याच्या राजकारणातील एक जुना जाणता राजकारणी नेता, माजी आमदार व शिरूर हवेलीच्या जनतेने ज्यांना लोकनेते अशी पदवी बहाल केलेली होती, असे माजी आमदार कै. बाबुराव काशीनाथ पाचर्णे, यांचे गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०२२ रोजी, रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी सव्वाबारा वाजता च्या सुमारास, दुःखद निधन झाले असून, ते विधान सभेवर भाजप च्या तिकिटावर दोनदा निवडून गेलेले होते. त्यांच्या पछ्यात पत्नी, चिरंजीव माजी जी प सदस्य राहुलदादा पाचर्णे, एक विवाहित मुलगी, नातवंडे, बहिणी, भाऊ व एकत्र कुटुंबातील भावंडे असा मोठा परिवार असून, लोकांनी त्यांना लोकनेते अशी पदवी दिलेली होती.

भाजप च्या तिकिटावर दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले बाबुराव काशिनाथ पाचर्णे, हे मूळचे शिरूर शहराला लागून असलेल्या तरडोबाच्या वाडीचे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. सुरुवातीपासूनच त्यांना राजकारणाची आवड असल्याने, त्यांनी प्रथम निवडणूक लढविली ती १९७८ साली, तत्कालीन शिरूर ग्रुप ग्राम पंचायतची. त्यात ते सदस्य म्हणून निवडून आले होते. त्या नंतर त्यांना संधि मिळाली ती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये. त्यांनी १९८५ मध्ये बाजार समितीचे निवडणूक जिंकत आपल्या कुशल नेतृत्वाने सभापती पदही मिळविले. १९८५ ते १९९३ पर्यंत सलग ८ वर्ष त्यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर मात्र त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत १९९५ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, परंतु त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे त्यांनी मोर्चा वळवून, १९९७ साली पुणे जिल्हा परिषदेवर ते निवडून गेले व १९९७ ते १९९९ पर्यंत त्यांनी जी प सदस्य म्हणून काम पाहिले.परंतु १९९९ मध्ये लागलेल्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेस कडून संधी घेतली, परंतु पुन्हा आमदारकीसाठी त्यांना अपयशी व्हावे लागले. मात्र २००४ च्या आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी भाजप कडून उमेदवारी मिळवत आमदार होण्याची संधी मिळविली. २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला परंतु त्यांना शिरूर मधून उमेदवारी मिळाली नाही.

माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे, शिरूर
माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे, शिरूर

मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांनी भाजप च्या तिकिटावर निवडून येत, भाजपची तालुक्यातील भक्कम मोट बांधण्याचे काम केले. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश पत्करावे लागले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना, त्याच वेळी त्यांना चक्कर येऊन ते कोसळले होते आणि तेव्हापासूनच त्यांना कर्करोग झाल्याचे वैद्यकीय इलाजात निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून सुमारे अडीच वर्षे ते या आजाराला तोंड देत होते. मात्र अधूनमधून काही कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असत. त्यांचे तालुक्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक व शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ऍड अशोक रावसाहेब पवार व ते काही महिन्यांपूर्वी, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी सामोरा समोर आले होते व त्यांनी दोघांनी मिळून एकच पुष्पहार महाराजांच्या गळ्यात घातला होता.अशाप्रकारे राजकारणात कुणीच शत्रू नसतो असे सतत कार्यकर्त्यांना सांगणाऱ्या लोकनेते कै बाबुराव काशिनाथ पाचर्णे यांनी, तालुक्यात, जिल्ह्यात व राज्यभरात फार मोठा मित्रपरिवार मिळविलेला होता. त्यामुळेच आज तालुका त्यांच्या जाण्याने पोरका झाल्याच्या भावना अनेकांनी सोशल मीडिया वर आपल्या भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते.

भाजपचे राज्यातील जेष्ठ नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच शिरूर येथे येऊन, मा आमदार बाबुराव पाचर्णे यांची रुग्णालयात भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या समवेत मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील होते. मात्र कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत त्यांची प्राणज्योत अखेर शिरूर येथे मालवली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारो लोकांनी शिरूर येथील बाबुराव नगर येथील त्यांच्या कार्यालयामध्ये रांग लावलेली होती. त्यांच्यावरील अंतिम संस्कार हा त्यांच्या मूळ गावी, म्हणजे तरडोबाचीवाडी येथे गुरुवार दि ११ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होणार आहे. शिरूरचे माजी आमदार व लोकनेते कै. बाबुरावजी पाचर्णे साहेबांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *