राणेंशी पंगा घेणं नडलं, केसरकरांचं पद अवघ्या दीड महिन्यात जाणार ?

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०८ ऑगस्ट २०२२


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर आमदार आणि भाजपचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर नेते दीपक केसरकर यांच्यावर शिंदेंनी प्रवक्तेपदाची मोठी जबाबदारी सोपवली. परंतु दीड महिन्यातच त्यांच्याकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या ३ आठवड्यांपासून अनेक पत्रकार परिषदांमधून केसरकरांनी भाजप-शिंदे गटात कटुता निर्माण होईल, अशी विधाने केल्याने भाजपचे काही आमदार नाराज आहेत. त्यांनी केसरकरांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही भाजप आमदारांनी केसरकरांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला आहे. त्याचमुळे केसरकरांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करुन त्यांच्याजागी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणून किरण पावसकर यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळतीये.दीपक केसरकर यांची राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचं कट्टर राजकीय वैमनस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. इकडे राज्यात शिंदे-फडणवीसांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी संधी मिळेत तेव्हा केसरकर नारायण राणे यांच्यावर तोफ डागत राहिले.

अगदी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी वारंवार आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन बदनामी केली, असा गंभीर आरोप केसरकरांनी राणेंवर केला. त्यानंतर मात्र नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र चांगलेच खवळले. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केसरकरांची तक्रार केली. इकडे एकनाथ शिंदे यांच्या कानावरही केसरकरांच्या अनेक तक्रारी गेल्याची माहिती आहे. त्याचमुळे केसरकरांना हटवून त्यांच्या जागी किरण पावसकर यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.राणे समर्थक राजन तेली यांनी तर दीपक केसरकरांना आवरा, गरज नसताना भाजप-शिंदे गटात कटुता निर्माण होतीये. त्यांनी वाचाळ बोलणं बंद करावा, अशी थेट मागणी फडणवीसांकडे केली आहे. भाजपच्या नेत्यांनी काय बोलावं, याचे अधिकार दीपक केसरकरांना दिलेले नाहीत. दीपक केसरकरांनी आपल्या मतदारसंघात जरा लक्ष द्यायला हवं. राज्यात शिंदे-फडणवीसांच्या सरकारवर जनता खूश असताना केसरकरांच्या विधानाने भाजप-शिंदे गटात कटुता निर्माण होतीये, ती टाळली पाहिजे, असं राजन तेली म्हणाले.दीपर केसरकर मागील महिनाभरापासून शिंदे गटाची बाजू अतिशय ताकदीने मांडत आहेत. मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार ते ठाकरे कुटुंबावरील प्रश्न -केसरकर प्रत्येक अगदी मोजक्या शब्दात विषय निपटवत आहेत. पण यादरम्यान राणेंवर प्रश्न आला की केसरकरांच्या भात्यातील बाण सुटलाच म्हणून समजा… राणेंवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.गेल्या सव्वा महिन्यापासून शिंदे गट आणि भाजपातील इच्छुकांचे डोळे कॅबिनेट विस्ताराकडे लागले आहेत. कुणी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलंय, तर कुणी देव पाण्यात बुडवून ठेवलेत. दीपक केसरकर हे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ठाकरे सरकारमध्ये केसरकरांकडे कुठलंही मंत्रिपद नव्हतं, पण आत्ता त्यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जातंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *