ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं मित्रपक्षांना पत्र

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०६ऑगस्ट २०२२


मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सेशन कोर्टाने त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी कोठडीतूनच संजय राऊतांनी आपल्या मित्रपक्षांना पत्र लिहिले आहे. ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवल्याबद्दल राऊतांनी त्यांचे आभार मानले आहेत.ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी संजय राऊत यांना पाठिंबा दर्शवला होता. कृती आणि विचारामधून पाठिंबा दिल्यामुळे मी मित्रपक्षांचे आभार मानतो, असं संजय राऊतांनी पत्रात लिहिलं आहे.

काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांना राऊतांनी पत्र लिहिलं आहे. रडायचं नाही लढायचं अशी बाळासाहेब ठाकरेंची नेहमीच शिकवण राहिली आहे. ही शिकवण घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. माझ्यावर जी ईडीची कारवाई झाली त्यावेळेस सगळ्याच मित्रपक्षांनी मला पाठिंबा दिला. विशेष: काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्वीट करत या कारवाईचा निषेध केला होता. यापुढेही आपल्यावर अशा प्रकारच्या कारवाई होत राहतील आणि आपल्यावर दबाब येत राहील. मात्र, आपण न घाबरता लढत राहिलं पाहिजे, असे राऊतांनी पत्रात लिहिलं आहे.राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर कारवाई केली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. मात्र, दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर या कठीण काळातून लवकरच बाहेर पडू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही सक्तवसुली संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केलाय. आता या प्रकरणात ईडी वर्षा राऊतांची चौकशी करणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *