जसे तुळशीच्या माळेत १०८ मणी तसेच तुकोबांच्या देहूत १०८ कुटुंबीयांकडून देहूत आपला परिवार फाउंडेशन कडून पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण
रोहित खर्गे
विभागीय संपादक
१९ जुलै २०२२
पिंपरी
“वृक्षांमध्ये देवांचा अधिवास असतो म्हणून वृक्षारोपण हे आध्यात्मिक कर्म आहे!” असे विचार श्री क्षेत्र देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे यांनी आणि वृक्षप्रेमी जगन्नाथ जगड यांनी वृक्षारोपण कसे करायचे प्रात्याक्षिक करून दाखवले. सदर कार्यक्रम अभंग इंग्लिश मीडियम स्कूल, देहू येथे रविवार, दिनांक १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आला.
फाउंडेशनचे अध्यक्ष एस आर शिंदे बोलताना म्हणाले या देहूच्या पवित्र ठिकाणी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज राहत होते. तुळशीची माळ पवित्र असते आणि त्या माळेत पवित्र १०८ मनी असतात. त्याचप्रमाणे आम्हीं फाउंडेशनचे १०८ कुटुंब निवडून त्यांच्याकडून ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळाची झाडे लावण्याची संकल्पना पुढे आली आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्त्यांनी तंतोतंत बजावली त्याबद्दल मी सर्व परिवाराचे अभिनंदन करतो आणि आज हा उपक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत महावृक्षारोपण होत आहे.
आपला परिवार (पिंपरी-चिंचवड) सोशल फाउंडेशनच्या एकशेआठ सदस्यांनी शिस्तीचे पालन करत गाड्या एक रेषेत पार्क करून या कार्यक्रमात आपल्या कुटुंबीयांसमवेत देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलजवळील गायरानावर एकशेआठ पिंपळांचे रोपण केले.
अभंग स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ॲड. कैलास पानसरे, डॉ. किशोर यादव, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, कोरोना योद्धा दीपक सोनवणे, योगेश आमले, अण्णा मटाले, आपला परिवारचे संस्थापक-अध्यक्ष एस. आर. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एस. आर. शिंदे यांनी बोलताना सांगितले या देहूच्या पवित्र भूमीत “पिंपळवृक्ष हा मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचे उत्सर्जन करीत असल्याने भावी काळात निर्माण होणारे एकशेआठ पिंपळांचे बन म्हणजे जणू ‘ऑक्सिजन फॅक्टरी’ होईल. तसेच प्लास्टिकमुक्त शहर, पाण्याचा जपून वापर, पेड अर्थात वृक्षारोपण आणि संवर्धन या तीन ‘प’ साठी ‘आपला परिवार’ कटिबद्ध आहे!” असा सामुदायिक संकल्प मांडला अन् त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले. डॉ. कविता अय्यर यांनी, “एक मोठे झाड एका वर्षात खूप मोठा कार्बन डायऑक्साइड शोषून वातावरणातील प्रदूषणाला आळा घालते. त्यामुळे आजचे वृक्षारोपण ही भावी पिढीसाठी आरोग्यदायी तरतूद आहे!” असे मत व्यक्त केले. प्रा. विकास कंद यांनी, “एक आई जन्म देते; परंतु ऑक्सिजन पुरविणारे वृक्ष हे मातेसमान आहेत!” अशी भावना व्यक्त केली. बाळासाहेब राठोड, चंद्रकांत श्रीमंत यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले; तर दुर्गश्री मराठे यांनी “झाडे लावू… झाडे जगवू…” ही कविता सादर केली.
ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे पुढे म्हणाले की, “देहूच्या पावन भूमीतील बोरी-बाभळींनाही सुवास आहे. संतांप्रमाणेच वृक्ष आपला देह मानवजातीसाठी किंबहुना अवघ्या चराचरासाठी झिजवत असतात. जागतिक पर्यावरणाच्या निकषानुसार प्रतिमाणसी चारशे बावीस वृक्ष असले पाहिजेत; परंतु भारतात हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण वृक्षाशी निगडित आहे; त्यामुळे प्रत्येक सणाला वृक्षारोपण केले पाहिजे!”
यावेळी ‘आपला परिवार’कडून पाच हजार लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी अभंग स्कूलला प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी नवदांपत्याकडून एका रोपाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘आपला परिवार’च्या एकशेआठ सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत प्रत्येकी एक याप्रमाणे वृक्षारोपण करताना प्रेरणादायी घोषणा दिल्या. ‘आपला परिवार’च्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ऑक्सिजन फॅक्टरीसाठी पूर्वतयारी करणाऱ्या सदस्यांचे आभार मानले.
किरण कांबळे, पराग खाडीलकर ,सचिन गावडे विजय शिर्के ,गिरीश काटे, किरण महाजन, संदीप दरवेशी,किरण चव्हाण, अजित भालेराव, दीपक मराठे,शंकर राणे,अशोक भोर,राजेश देशमुख,अभय गादिया,भगवंत थोरात, उल्हास तापकीर, गुलचंद लोखंडे,रोहिदास बिरामणे, डी एस कुंभार ,स्वामी कुल्पका…यांनी पूर्वतयारी साठी प्रयत्न केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी श्रमपरिहार स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.सविता होनराव यांनी प्रास्ताविक केले. अनिल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम शिर्के यांनी आभार मानले.