“समाजाला आज गांधी विचारांची खरी गरज”- अण्णा हजारे
रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ मे २०२२
राळेगणसिद्धी
पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा २०२१ चा यशवंतराव चव्हाण सह्याद्री साहित्य पुरस्कार नांदेड येथील डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेल्या ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तकाला ज्येष्ठ समाजसेवक पदमभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे प्रदान करण्यात आला.रोख रक्कम,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी बोलताना हजारे यांनी ‘गांधी विचारांची समाजाला सध्या गरज असून नव्या पिढीवर संस्कार करण्यासाठी लेखकांनी या विषयावर लिहिले पाहिजे असे सांगितले. पुरस्कार हे प्रेरणा देणारे असतात.समाजात उत्तम काम करणाऱ्या लोकांचा सत्कार केलाच पाहिजे.’असेही ते म्हणाले.
सह्याद्री साहित्य पुरस्काराने डॉ.जगदीश कदम सन्मानित
डॉ. कदम म्हणाले- ‘गांधी विचार हा एक उत्तम जगण्याचा मार्ग असून अण्णांसारख्या ज्येष्ठ समाजसेवकाच्या हस्ते आपणाला हा पुरस्कार मिळणे ही पुरस्काराइतकीच सन्मानाची बाब आहे’ अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले यांनी केले. याप्रसंगी कवी भरत दौंडकर आणि प्राचार्य डॉ. विठ्ठल एरंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेश कंक यांनी आभार मानले. याप्रसंगी दत्तात्रय जगताप यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.