चिंचवडच्या ज्येष्ठ सायकलपटूने केला पुणे-नेपाळ-पुणे सहा हजार किलोमीटर सायकल प्रवास

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ एप्रिल २०२२

पिंपरी


वाढते प्रदूषण, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, निसर्गाचा -हास याबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील राजेंद्र चोथे (वय ६१) या ज्येष्ठ सायकलपटूने अनोखा उपक्रम केला. पुणे-नेपाळ-पुणे असा तब्बल सहा हजार किलोमीटरचा प्रवास एकट्याने पूर्ण करून त्यांचे शुक्रवारी (दि. ८) चिंचवड येथे आगमन झाले. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला असल्याचे राजेंद्र चोथे यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षणासाठी राजेंद्र चोथे यांचा उपक्रम

सहा हजार किलोमीटर सायकल प्रवास करून शुक्रवारी (दि. ८) राजेंद्र चोथे यांचे चिंचवड येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे एम्पायर ईस्टेट मित्र मंडळ आणि इतर विविध संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी एम्पायर ईस्टेट मित्र मंडळाचे अध्यक्ष अॅड. दिलीप पाटील, श्री मांजराई देवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय साळवी, महाराष्ट्र पर्यावरणचे अध्यक्ष अशोक मोरे, माजी नगरसेवक काळूराम पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, ज्येष्ठ उद्योजक बाबुराव सागावकर, बांधकाम व्यावसायिक राजेश अगरवाल, उद्योजक वासू शेट्टी, रबड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष रामदास माळी (टाटा मोटर्स), ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश व्यास, यतीन पारेख, डॉ. जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हिंदुराव मोहिते, एम्पायर ईस्टेट महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी संकपाळ, स्वयंसिद्धा महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविता मोरे, एम्पायर ईस्टेट फेज एकचे अध्यक्ष संतोष पिंगळे, एम्पायर इस्टेट फेज दोनचे अध्यक्ष राम खेडकर, एम्पायर स्टेट फेज तीनचे अध्यक्ष विकास चौधरी, वृक्षवल्ली सायकल ग्रुप चिंचवडचे विक्रम मुडपे, निसर्ग सायकल मित्रचे समीर दळवी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरीश ललवाणी, विठ्ठल गवसणे, सुयश कुलकर्णी, जयकुमार नारकर, अर्चना नलावडे, शीतल साळवी, अनुराधा देशमुख, वंदना नारकर, नीलिमा शेवाळे,  टाटा मोटर्स मधील सर्व आजी माजी कर्मचारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजेंद्र चोथे यांनी २२ फेब्रुवारी रोजी एम्पायर इस्टेट, चिंचवड येथून प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ गाठले. त्यानंतर परतीचा प्रवास त्यांनी नेपाळ, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र या मार्गे केला. दरम्यान, नाशिक त्रिंबकेश्वर, काशी विश्वनाथ, उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर, घृष्णेश्वर ही ज्योतिर्लिंगं तसेच आयोध्या, सीतामढी ही धार्मिक ठिकाणे तसेच बाबा आमटे यांचे हेमलकसा, आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थक्षेत्र कपिलवस्तू, लुम्बिनी, अजंठा वेरूळ, खजुरो मंदिर, प्रयागराज, खुशीनगर, गया, आनंदवन, शेगाव, सेवाग्राम आदी ठिकाणी भेट दिली. पुणे ते नेपाळ मोहिमेत त्यांनी स्वच्छता, पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरण याबाबत जनजागृती केली. ही मोहीम त्यांनी स्वखर्चाने केली.

४० दिवसात राजेंद्र चोथे यांनी सहा हजार किलोमीटर सायकल प्रवास केला. हा संपूर्ण प्रवास त्यांनी एकट्याने केला आहे. राजेंद्र चोथे हे धाडसी सायकलपटू आहेत. त्यांनी टाटा मोटर्स मध्ये ३२ वर्ष सेवा केली आहे. सेवेत असताना ते दररोज टाटा मोटर्स मध्ये सायकलवर जात असत. टाटा मोटर्स कंपनीतून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना सायकल चालविण्याचा छंद आहे. त्यांनी आजवर पुणे ते शिर्डी, पुणे ते गोवा, पुणे ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. आपण हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी सुरु केला असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान पाच किलोमीटर सायकल चालवायला हवी, अशी तळमळ त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजेंद्र चोथे यांची स्नुषा डॉ. श्वेतांबरी चोथे यांनी ‘आयुष्य दोन चाकाचे’ ही स्वरचित कविता सादर केली. राजेंद्र चोथे यांच्या पुणे-नेपाळ-पुणे या सायकल प्रवासावर आधारित ही कविता त्यांनी चोथे स्वागतावेळी सादर केली. यावेळी चोथे यांचा मुलगा डॉ. विकास चोथे उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *