ग्रामीण भागातील खेळाडूंना  नेमबाजी, तिरंदाजीसाठी जिल्हास्तरावर क्रीडा किट्स द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ मार्च २०२२

पिंपरी


देशातील ग्रामीण भागातील खेळाडूंकडे प्रतिभेची कमतरता नाही. केवळ महागडे क्रीडा साहित्य खरेदी करु शकत नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू नेमबाजी, तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. ऑलिम्पिक किंवा इतर स्पर्धांमध्ये खेळाडूंना पदके मिळत नाहीत. त्यामुळे  केंद्र सरकारने खेळाडूंना  क्रीडा किट्स  जिल्हा स्तरावर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

खासदार बारणे म्हणाले, आपल्या देशात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. नेमबाजी आणि तिरंदाजीचा खेळ करतात. यामध्ये ग्रामीण भागातील गरीब लोकही सहभागी होऊ शकतात. त्यांच्यातही प्रतिभेची कमतरता नसते. पण, या खेळांमध्ये वापरले जाणारे किट इतर खेळांपेक्षा महागडे आहेत. जर आपण तिरंदाजीबद्दल बोललो तर आशिया चषक आणि ऑलिम्पिक खेळांसाठी रिकर्व आणि कंपाऊंड बाण-धनुष्य वापरले जातात. त्याची किंमत सुमारे दोन ते अडीच लाख रुपये आहे. तर, कोणी रायफल इव्हेंट सुरू केल्यास त्याला ट्राउझर, जॅकेट, इनर, हातमोजे, शूज घ्यावे लागतात. त्याची किंमत ६०  ते ७०  हजार रुपये आहे. रायफलची किंमत २.५०  ते १०  लाख रुपयांपर्यंत आहे. पिस्तुल ४ ते ५ लाखांपर्यंत आणि शूज १५  हजार रुपयांपर्यंत येतात. शॉटगनमध्ये वापरल्या जाणाऱ्या जॅकेटची किंमत ९  हजार रुपये आहे. या गेम किटची किंमत जास्त असल्याने ग्रामीण भागातील  गरीब प्रतिभावान खेळाडूंना ते विकत घेता येत नाही. त्यामुळे या खेळाडूंना विविध खेळांमध्ये भाग घेता येत नाही.

आपल्या एवढ्या मोठ्या विशाल देशात खेळाडूंना सोयीसुविधांचा अभाव असल्याने ऑलिम्पिक किंवा इतर स्पर्धांमध्ये पदके मिळत नाहीत. शासनाने या क्रीडा किट्स खेळाडूंना जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिल्यास हे गावे बळकट होतील. नेमबाजी आणि तिरंदाजीसाठीच्या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील गरीब खेळाडू सहभागी होऊ शकतात. देशाचे नाव रोशन करण्यासोबतच देशासाठी पदकही मिळवून देतील. त्यामुळे सरकारने जिल्हा स्तरावर खेळाडूंना क्रीडा किट्स उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार बारणे यांनी लोकसभेत केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *