केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ जुन्नरला नाभिक समाजाचा मोर्चा
कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
१५ मार्च २०२२
जुन्नर
जालना येथील राजकीय सभेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाआघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील नाभिकांचे उदाहरण देऊन अवमानकारक वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याने जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्था व तालुक्यातील संपूर्ण नाभिक समाजाने जुन्नर तहसीलवर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल बेताल,वाचाळ व अवमानकारक “आघाडी सरकार म्हणजे अर्धवट काम करणारे महाराष्ट्रातील तिरुपतीचे नाव्ही आहेत असे अपमानित करणारे विधान केले.समस्त नाभिक समाज हा शांत,सयंमी ,कष्टकरी आणि वेळ पडल्यास शौर्य सिध्द करून बलिदान करणारा समाज आहे.छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणांचे बलिदान देणारा शिवा काशीद तसेच अफजलखान वधाच्या वेळी आपले शौर्य दाखविणारा जिवाजी महाले तर अलीकडे भाई कोतवाल पर्यंत सर्व नाभिक बांधवांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहेच आणि सिद्ध झालेली आहे.
अशा देशप्रेमी समाजाबद्दल दानवे यांच्या जातीय बेताल वक्तव्यामुळे समाजाच्या अस्मितेला ठेच पोहचवून समाजाच्या भावना दुखावल्याने सकल नाभिक समाज संतप्त झाला आहे व निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चात शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. नाभिक समाजाचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून समाजाचा अवमान करणाऱ्या बेताल दानवे सारख्या बेताल राजकीय व्यक्तींच्या विरोधात आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा वाचाळ व्यक्तींना मंत्री पदावरून दूर करून माफी मागण्यासाठी सांगावे यासाठी जुन्नर तालुका नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाने नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निषेध मोर्चा काढून निवेदन दिले व संविधानाचा अपमान करणाऱ्या आणि कोणत्याही समाजाबद्दल अशोभनीय वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन उपेक्षित समाजाला न्याय मिळवून द्यावा.
या निषेध मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष अरुण क्षीरसागर, उपाध्यक्ष सचिन कालेकर व तेजपाल रायकर, कार्याध्यक्ष सुनिल खंडागळे, सचिव नित्यानंद नेवकर,खजिनदार किसन कदम,संचालक रविंद्र भोर,निलेश नेवकर,शंकर डाके,नामदेव नायकवडी,युवराज शिंदे, गणेश नायकवडी,शरद कदम,शंकर डाके,रविंद्र रायकर,प्रविण भोर यांच्यासह तालुक्यातील असंख्य नाभिक बांधवांनी केले.