लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी एकत्रित यावे – पोलीस उपायुक्त सागर पाटील

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१५ फेब्रुवारी २०२२

पुणे


पुणे शहर तसेच जिल्ह्यात लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी बालकांच्या अधिकारासंदर्भात कार्य करण्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी केले.अल्पबचत भवन येथे ज्ञानशक्ती विकास वाहिनी व सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘बालकांसाठी एक पाऊल न्यायासाठी’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, बाल कल्याण संरक्षण समितीचे सदस्य अर्जुन दांगट, बाल संरक्षण अधिकारी परमानंद, बालकल्याण समितीचे बीना हीरेकर, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या व्यवस्थापक हेमंती पवार, प्रसाद ताटे उपस्थित होत्या.पाटील म्हणाले, आपल्याकडे सद्यस्थितीत बालकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात, ते सोडविण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाची मानसिकता बदलायला हवी. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये संस्कृतीची जपवणुक होत असल्याने या संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

बालकांसाठी एक पाऊल न्यायासाठी उपक्रमाचा शुभारंभ

लष्कर पोलीस स्टेशनने पहिले चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनचा बहुमान मिळवला असल्याचा उल्लेख करून पाटील म्हणाले, व्यसनाधिन मुले तसेच न कळत घडणाऱ्या चुकांना सुधारण्याची संधी देण्यासाठी ‘चाइल्ड फ्रेंडली’ पोलीस स्टेशन काम करते. या सर्व उपक्रमात स्वयंसेवी संस्थांचा सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. संस्थांनी एकत्रित येत याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.दांगट म्हणाले, बालकांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. बालकांची सुरक्षा फक्त कायद्याने निर्माण होणार नाही, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असला पाहीजे.

परमानंद म्हणाले, बालकांची काळजी व संरक्षणाची गरज आहे. आपली सर्वांची ही सामाजिक जबाबदारी आहे. बालकांशी संवाद साधला पाहीजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहीजेत. पुणे जिल्ह्यात चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची संख्या वाढत असून चांगला उप्रकम असल्याचेही ते म्हणाले.कदम म्हणाले, कुटुंबातील सुख महत्त्वाचे आहे. पालक व मुलांमधील संवाद महत्त्वाचा आहे. मुलांशी संवादातून मुलांना काय पाहीजे, याबाबत पालकांना सहज समजू शकेल.

ज्ञानशक्ती संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी काळे पाटील यांनी संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘बालकांसाठी एक पाऊल न्यायासाठी’ उपक्रमाबाबत माहिती दिली.१५ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२२ या कालावधीत हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *