खेड दौऱ्यावर असलेले संजय राऊत यांच्या या इशाऱ्याला आता आमदार दिलीप मोहिते यांनी ‘मी सरसेनापती हंबिरराव मोहितेंचा वंशज, असल्या धमक्यांना जनताच उत्तर देईल’, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलंय.

प्रतिनिधी -अक्षता कान्हूरकर

राजगुरूनगर दि ४ सप्टेंबर २१

खेड पंचायत समिती सभापती निवडणुकीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जोरदार राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. शिवसेनेचं बहुमत असूनही खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. या पार्श्वभूमीवर खेड दौऱ्यावर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. संजय राऊत यांच्या या इशाऱ्याला आता आमदार दिलीप मोहिते यांनी ‘मी सरसेनापती हंबिरराव मोहितेंचा वंशज, असल्या धमक्यांना जनताच उत्तर देईल’, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलंय.
‘मी माझ्या बाजूने सर्व गोष्टी क्लिअर केल्या होत्या. संजय राऊत यांसारख्या नेत्यांनी माझ्यावर टीका करावी इतका मोठा मी नाही. गेल्या तीन महिन्यापासून त्यांना संधी मिळाली की ते माझ्यावर टीका करतात. टीका करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे म्हणून ते टीका करत असतील. मात्र अलीकडच्या काळात धमकी ते धमकीही देत आहेत. मी पराभव पचवलेला माणूस आहे. मी लढवय्या कार्यकर्ता आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वंशज आहे. त्यांनी दिलेल्या धमक्यांना खेड तालुक्यातील जनताच उत्तर निश्चित देईल, असा पलटवार दिलीप मोहिते यांनी केलाय.

‘..त्यामुळे शिवसेनेची वाताहात’
पंचायत समितीत जेवढे शिवसेनेचे सदस्य आहेत त्यांना त्रास दिला म्हणून ते शिवसेनेत राहिले नाहीत. त्यांनी अरुण चौधरी यांना पंचायत समितीचा सभापती करून दाखवलं. याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. यात दिलीप मोहितेंचा सहभाग आहे का? राऊत कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करतात याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांच्या पक्षात त्यांनी शिस्त आणावी किंवा नाही हा त्यांचा भार आहे. आपला पक्ष चालवत असताना जो तो आपल्या पद्धतीने काम करत असतो. माझ्या नेत्यांचा आणि माझ्या पक्षाचा माझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे. त्यामुळे मला कुणीही नेता तालुक्यात आणावा लागला नाही. या तीन महिन्यात संजय राऊत दोन वेळा आले. याचाच अर्थ शिवसेनेमध्ये फार काही आलबेल नाही, हे त्यांनी स्वतः मान्य केलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. शिवाजीराव आढळरावांसारखं नेतृत्व परिसरात काय काम करत आहे? त्यामुळे शिवसेनेची वाताहात झाली. आजही संजय राऊतांना खोटी माहिती देतात. कदाचित ते शिवसेनेसोबत आघाडीचंही नुकसान करत आहेत. सत्तेत फक्त एकटा शिवसेना पक्ष नाही त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही आहेत, अशी टीकाही मोहिते यांनी केलीय.

आमदार मोहितेंचा शिवसेनेला खोचक टोला मारलाय.
शिवसेना आज राज्य करते, त्यात उद्धव ठाकरे यांना आम्ही नेतृत्व दिलं आहे. याचा अर्थ आमचा काहीच वाटा नाही का? वेळोवेळी त्यांनी सांगायचं आम्ही एक नंबर आहोत. सर्व जगाला माहिती सगळी माहिती आहे. त्याबाबत सांगायची गरज त्यांना नाही. गेल्या दोन वर्ष अजित पवारांनी सरकार चालवले. कोरोना काळात ठामपणे मंत्रालयात बसून लोकांची कामं त्यांनी केली, असा खोचक टोलाही मोहिते यांनी लगावलाय.

आम्ही कधीपर्यंत सहन करायचं?
जे वक्तव्य आपण करतो त्याच्या आघाडीवर परिणाम होणार नाही, याचं भान ठेवलं पाहिजे. तिन पक्ष बरोबर राहून राज्याचा कारभार केला तर बर होईल. अन्यथा आघाडीमध्ये बिघाडी झाली तर भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येणार नाही. मी आमच्या नेत्यांना देखील विनंती करणार आहे की, आता खूप झालं, आम्ही कधीपर्यंत सहन करायचं? मी अनेकदा सांगितलं यात माझा काहीही दोष नाही, असंही आमदार मोहिते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *