माजी महिला सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍याला अटक…५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई..

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन दोन महिला सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीनही आरोपी दोन महिन्यांपासुन फरार होते.
या प्रकरणातील आरोपींना ३ ऑगस्ट २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत तत्कालीन सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे (राहणार नारायणवाडी, नारायणगाव, तालुका जुन्नर) व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेणभाऊ खराडे (राहणार मंगरुळ, तालुका जुन्नर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन एक आरोपी माजी सरपंच ज्योती दिवटे या अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या दोन आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ एप्रिल २०१५ ते १८ डिसेंबर २०१५ या कालावधीत नारायणगाव ग्रामपंचायतच्या जयश्री मेहेत्रे, ज्योती दिवटे या सरपंचपदी तर राजेंद्र खराडे ग्रामविकास अधिकारीपदी कार्यरत होते. या कालावधीत ग्रामपंचायतीत रोखीने आर्थिक व्यवहार करणे, इ टेंडरिंग न करता खरेदी करणे, पावती नसताना पैसे खर्च करणे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च करणे आदी बेकायदेशीर व्यवहार करून शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे ग्रामपंचायत तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन एक आरोपी माजी सरपंच ज्योती दिवटे या अद्याप फरार आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हेड काॅन्स्टेबल राहुल कदम, नितीन दळवी, विशाल साळुंखे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *