शिरूर ग्रामीणच्या साडेसोळा कोटींची पाणी फिल्टर योजना कुचकामी – शुद्ध पाण्यासाठी महिलांचा ग्रा पं वर मोर्चा.

(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक.)

रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशीय्य सामाजिक संस्थेचा वतीने, शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतला एक निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, सध्या रामलिंग म्हणजेच शिरूर ग्रामीण ग्राम पंचयात मार्फत सार्वजनिक नळांना जे पाणी येत आहे, ते पूर्णपणे फिल्टर नसून ते पाणी अशुद्ध स्वरूपाचे आहे. त्यामुळे मिळणारे पाणी हे सर्वांना शुद्ध स्वरूपात व लवकरात लवकर मिळावे. नाहीतर आम्ही महिला, रिकामे पाण्याचे हांडे घेऊन उपोषणास बसु, असे निवेदनात म्हटलेले आहे. शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत येथे, साडेसोळा कोटीची फिल्टर पाणी योजना राबविण्यात आलेली आहे, परंतु या योजने अंतर्गत एकदाही फिल्टर पाणी मिळालेले नाही. कधी पाणी खुप गढूळ असते, तर कधी आळई, तर कधी फेस व वास येत असतो. एवढे पैसे खर्च करूनही प्यायला शुद्ध पाणी मिळत नसून, सर्वांनाच फिल्टर पाणी विकत घ्यावे लागत असून, ते न परवडणारे आहे. हे पाणी पिले तर अनेक आजार संभवतील. त्यामुळेच शुद्ध पाणी त्वरित मिळावे असे निवेदन, उपस्थित महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीला देण्यात आले. ग्रामसेवक बाळासाहेब शेळके व सरपंच नामदेव जाधव यांच्या अनुपस्थितीत, हे निवेदन कारकून शिवाजी महाजन यांना देण्यात आलेय. या महिलांचे असेही म्हणणे आहे की, फिल्टर पाणी योजने आधी नळांना जे बोर चे पाणी येत होते, ते पाणी सर्वजण पीत होते. परंतु आत्ता नळांना येणारे पाणी हे पिण्यायोग्य नसून, ते फिल्टर पाणी बंद करून पूर्वीचेच बोरचे पाणी देण्यात यावे अशी मागणी महिलांनी केलेली आहे. फिल्टर पाणी योजना येणार हे जेव्हा समजले, तेव्हा सर्व महिला आनंदित होत्या. परंतु ही योजना चालु झाली आणि सर्व महिला नाराज झाल्या. एवढे पैसे खर्च करूनही, ही योजना अयशस्वी का झाली ? याची कारणे कोणती ? हे शोधून ही योजना यशस्वी करावी व सर्वांना शुद्ध पाणी द्यावे. ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन 11 महिने झालेत. ही योजना ताब्यात घेण्या अगोदरही हे पाणी शुद्ध नव्हते व आत्ताही पाणी शुद्ध नाही. त्यामुळे, नळ कनेक्शन ला बसविण्यात आलेले पाणी रीडिंग चे मीटर हे काढून टाकावेत. जर, शुद्ध पाणीच मिळत नसेल, तर हे मीटर बसविण्याचे कारणच काय ? असाही संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केलाय. रामलिंग गावठाणातील या महिलांशिवाय बाबुराव नगर,रामलिंग रोड च्या अनेकांनी सध्या नळाला येणाऱ्या अशुद्ध पाण्याबद्दल तक्रारी आमच्याकडे केल्याचे, राणिताई कर्डीले यांनी सांगीतले.
हे निवेदन देतेवेळी, रामलिंग महिला उन्नती बहु. सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ राणी कर्डिले, नंदा अभंग, ज्योति दळवी, अनिता दळवी, ज्योती चव्हाण, सीता गोसावी, मंदा गोसावी, इंदू गोसावी, लता शिर्के, छाया शेवाळे, अक्षदा ढवळे, नंदा दसगुडे आदि महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *