नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो;सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा

रोहित खर्गे, विभागीय संपादक

मुंबई, दि.३१ डिसेंबर – “मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेले, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मावळत्या २०२० वर्षाने आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्यागोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करुया. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धुत रहाणे या त्रिसूत्रीचे पालन करुया. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळुहळु काळजीपूर्वक सुरु करुया असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

येणारे नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारे, राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *